- हेरवाड, ता. शिरोळ : (लोकहिरा प्रतिनिधी)
बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी राबविण्यात येत असलेल्या 100 दिवसांच्या विशेष अभियानांतर्गत हेरवाड हायस्कूल,हेरवाड येथे बालविवाह प्रतिबंधक जनजागृती व शपथ ग्रहण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना निता आवळे, आनंदा कांबळे अमोल कदम यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी, तसेच मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. बालविवाह हा गुन्हा असून तो मुलांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासाला अडथळा ठरतो, हे यावेळी स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तसेच गावातील उपस्थित नागरिकांनी बालविवाहाला विरोध करण्याची व समाजात जागृती निर्माण करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाला हेरवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश मोहिते सर, सर्व शिक्षकवृंद, सामाजिक कार्यकर्त्या नीता आवळे, अमोल कदम, आनंदा कांबळे आणि Just Rights for Children संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या अभियानामुळे शालेय पातळीवरून बालविवाह प्रतिबंधाची ठोस जनजागृती होत असून समाजात सकारात्मक बदल घडण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. हेरवाड परिसरात हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.













