

कोल्हापूर, लोकहिरा न्यूज वृत्तसेवा:
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अवनि संस्था, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जून ते ७ जून २०२६ या कालावधीत राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे “पुनर्चक्रीकरण उत्सव” आयोजित करण्यात आला आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, कचरा हीच संपत्ती मानून त्याचे पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करण्याबाबत जनजागृती करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. या चार दिवसीय उत्सवात तज्ज्ञ मार्गदर्शक विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
उत्सवाचे उद्घाटन मा. सरस्वती वाघमारे (संचालक – कागद काच कष्टकरी पंचायत संस्था, पुणे) यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मा. गजानन गुरव, मा. माधुरी पाटील आणि मा. प्रमोद माने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान “कचरा वेचकांचे पुनर्चक्रीकरणातील योगदान”, “कचरा हीच संपत्ती”, “ओल्या कचऱ्यापासून खत व बायो एन्झाईम निर्मिती” तसेच “वृक्षांचे संवर्धन” या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उत्सवात कचरा वेचक महिला सेवा सहकारी संस्था मर्या. कोल्हापूर, वसुंधरा कचरा वेचक संघटना कोल्हापूर, कचरा वेचक महिला संघटना सांगली व सातारा विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांचा सहभाग आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याची गरज असून, या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













