लोकहिरा न्यूज वृत्तसेवा:-



इचलकरंजी येथील
साप्ताहिक विशाल क्रांतीच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा गौरव.
समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान.
साप्ताहिक विशाल क्रांती व विशालक्रांती न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मानाचा फेटा बांधून त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे महिलांचा करण्यात आलेला सन्मान कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात संपादक आप्पासाहेब भोसले यांनी साप्ताहिक विशाल क्रांतीची स्थापना सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आल्याचे सांगितले. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सुलोचना कोळी यांनी “साप्ताहिक विशाल क्रांतीचे पुढे दैनिकात रूपांतर व्हावे,” अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत व सत्कार संपादक आप्पासाहेब भोसले यांनी केले.
मनोगतात बोलताना महाराष्ट्र दूरसंचार बीएसएनएल उपाध्यक्ष विजयानंद माने यांनी सध्याचे युग हे मोबाईलचे युग असल्याचे सांगत सैनिक, शेतकरी व पोलिसांचा सन्मान होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. “मानाचा फेटा बांधून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविण्याचे कार्य संपादक आप्पासाहेब भोसले यांच्या माध्यमातून होत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
बदलत्या सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण होणे आवश्यक असून मोबाईलमुळे संस्कार व कौटुंबिक नात्यांमध्ये बदल होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांनी सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे लेखन करावे, कारण पत्रकार हे वर्षातील ३६४ दिवस समाजासाठी कार्यरत असतात, असेही त्यांनी सांगितले.
पालकांनी आपल्या मुलांच्या मनोरंजनाच्या साधनांवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत विशाल क्रांती न्यूज व साप्ताहिक विशाल क्रांती सीमा भागातील जनतेच्या समस्यांवर सातत्याने प्रकाश टाकत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
या कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौ. भाग्यरेखा पाटील, महाराष्ट्र दूरसंचार बीएसएनएल उपाध्यक्ष विजयानंद माने, अँटी करप्शन महाराष्ट्र स्टेट डिरेक्टर संजय पाटील, कामगार नेते आनंद गुरव, रिलस्टार अश्विनी पवार, केशव धुमाळे, जितेंद्र चौगुले, सुरेंद्र पिंपळे, सुलोचना कोळी, ॲड. गीता म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील अनेक पुरस्कारप्राप्त नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रमुख मान्यवरांचे स्वागत वैशाली मालप मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पवार सर यांनी तर आभार प्रदर्शन जगताप यांनी केले. उत्साहपूर्ण वातावरणात हा वितरण सोहळा संपन्न झाला.













