


आमदार जयंत आसगावकर यांची मागणी; एसएससी बोर्ड येथे संस्थाचालकांची बैठक संपन्न
कोल्हापूर : ( लोकहिरा न्यूज प्रतिनिधी)
संस्थाचालकांना आज शाळा, कॉलेज चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच कोल्हापूर बोर्डाने प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक केले आहे. यासाठी संस्थाचालकांना मोठा आर्थिक भार सोसावा लागणार आहे. त्यामुळे बोर्डाने सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक न करता तो ऐच्छिक करावा. तसे शासनास कळवावे, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी केली. एसएससी बोर्ड येथे पार पडलेल्या संस्थाचालकांच्या मीटिंगमध्ये ते बोलत होते. या मिटिंगला बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, अधिकारी यांच्यासह संस्थाचालक उपस्थित होते.
आमदार जयंत आसगावकर यांनी संस्थाचालकांच्या वतीने भूमिका मांडली. ते म्हणाले, एसएससी बोर्डाने जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवून आदर्श घालून दिलेला आहे. आज शासन शाळांना केवळ 5 टक्केच वेतनेत्तर अनुदान देते. त्यामध्ये खडू खर्च भागत नाही. अशा परिस्थितीत संस्थाचालकांना विविध परीक्षा घेताना बाहेरून बेंच व जनरेटर भाड्याने आणावे लागतात. ही खर्चिक बाब आहे. परीक्षा केंद्रांवर शासनाची बैठे स्कॉड व भरारी पथक फिरत असतात, मग सीसीटीव्ही लावण्यासाठी आग्रह का ? असा सवाल आमदार जयंत आसगावकर यांनी उपस्थित केला. आज शासन विविध योजनांवर करोडो रुपये खर्च करत आहे, पण दुसरीकडे शाळांसाठी निधीची कोणतीच तरतूद नाही. परीक्षा केंद्र लहान ठेवणे, सुपरवायझर व केंद्र संचालकांना तालुक्याच्या ठिकाणी केंद्र देऊ नये, भाडेतत्त्वावरती सीसीटीव्ही बसवून देणे अथवा जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करणे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तशी राज्य शासनाला भूमिका कळवावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका असल्याची संस्थाचालकांनी यावेळी बोलून दाखवली.












