सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई ;
बिबट्यांच्या कातड्यांसह चौघांना अटक
रत्नागिरी :- लोकहिरा वृत्तसेवा


वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कोल्हापूर आणि रत्नागिरी सीमा शुल्क विभागाला यश आले आहे. कोल्हापूर शहरालगतच्या महामार्गावर रविवार २९ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात दोन बिबट्यांची कातडी जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ( चार संशयितांची नावे सीमा शुल्क विभागाने जाहीर केलेली नाहीत )
बिबट्यांच्या कातड्यांची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती सीमा शुल्क विभागाच्या ‘प्रिव्हेंटिव्ह अँड इंटेलिजन्स’ शाखेला मिळाली होती. या माहितीनुसार, अधीक्षक हिमांशु शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने सापळा रचून कोल्हापूर महामार्गावर एका संशयास्पद मरून रंगाच्या किया सेल्टोस कारला अडवले. कारची झडती घेतली असता त्यात दोन बिबट्यांची कातडी मिळून आली. सीमा शुल्क विभागाने ही कातडी आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. यासोबतच काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही हस्तगत करण्यात आली आहेत.
अटक करण्यात आलेले दोनही आरोपी कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील रहिवासी आहेत. उर्वरित दोन आरोपी सातारा आणि लातूर येथील रहिवासी आहेत.
या यशस्वी मोहिमेत अधीक्षक लक्ष्मीकांत भाटकर, संदीप कौशिक, निरीक्षक राजेश लाडे, रोहित भालेकर, रितिक कुंभलवार, रमेश गुप्ता, अंकित सिन्हा तसेच हेड हवालदार संजय एम. जाधव आणि हवालदार अभिषेक यादव यांचा समावेश होता.











